कालच कामानिमित्त गोव्याला भेट देण्याचा प्रसंग आला. ज्यांना ज्यांना मी गोव्याला चाललोय असे सांगीतले तेव्हा बहुतांशी लोकांची एकच प्रतिक्रिया होती.
ती म्हणजे “वॉव ! मज्जाय”. कोणी काजू आणायला सांगीतले तर कोणी वाईन.
मी पण मनातूनच आनंदी झालो होतो. बर्याच वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या लग्नाला मडगावला जायचा योग आला होता त्यानंतर पुन्हा गोव्याचे दर्शन झालेच नव्हते. पण ह्या आनंदावर लवकरच विरजणच पडायला सुरुवात झाली. एकतर कोकणाला मान्सूनने दिलेल्या तडाख्यामुळे गेले ११ दिवस कोकण रेल्वेची वाहतूक बंद पडलेली. शेवटी बसने जायचे ठरविले. त्यातही हाताशी वेळ कमी असल्यामुळे एस.टी. ची चौकशी करता आली नाही. शेवटी “नीता” च्या एसी बसचा पर्याय निवडला.
बसने जास्त लांबचा प्रवास करायचा म्हणजे पहिला प्रश्न येतो तो म्हणजे दोन नंबरचा. पोट व्यवस्थीत राहील ना ? जेथे गाडी थांबेल तेथे सुविधा व्यवस्थीत असेल ना ? बाजूचा सहप्रवासी कसा असेल ? गाडी व्यवस्थीत असेल ना ? ड्रायव्हर नीट असेल ना ? एक ना दोन…..
रात्री ९.३० ची बस भारतीय प्रमाणवेळेनुसार १०.३० वाजता आली. सुदैवाने बस नीटनेटकी होती. सहप्रवासी काकांना सर्दी असावी बहुतेक. त्यांनी तोंडाला रुमाल बांधून स्वतःची आणी सहप्रवाशांची काळजी घेतली होती हे पाहून बरे वाटले. बस रात्री एकदा आणी सकाळी एकदा अशी दोनदा २० मिनिटांसाठी थांबली आणी काहींनी पोटं भरुन घेतेले तर काहींनी खाली करुन घेतली.
ह्या वेळच्या प्रवासात नजरेत भरलेल्या दोन गोष्टी म्हणजे जागोजाग झालेली हॉटेल्स आणी शैक्षणिक संकुले. दुकानातील इतर वस्तूंबरोबर सिगारेट, गुटखा विकणार्या मुली पाहून मनाला दु:खच झाले. आता त्यांच्या द्रुष्टीने साबण काय आणी सिगारेट काय केवळ विकण्याची वस्तूच. पण त्यांनी त्या विकू नयेत असे मनाला वाटले हे निश्चित!
बराचसा प्रवास अंधारात झाल्यामुळे कोकण नीट निरखता आला नाही. मात्र कुडाळपासून पुढचा भाग सकाळच्या प्रवासात अनुभवता आला. हिरवाईची विविध रुपे बघून मन आनंदून गेले. पावसाने मुंबईपासून निघतांना जी साथ दिली ती शेवटपर्यंत. मात्र काहीही म्हणा ! एस.टी. च्या प्रवासात खिडकीतून येणारे पावसाचे तुषार, थंड हवा, लाल मातीचा वास यापैकी काही काही एसी बसच्या प्रवासात अनुभवता येत नाही. आपण आणी बाहेरचे जग यात एक न ओलांडता येणारी सीमारेषाच असते जणू !
गोवा आता बराच बदललाय असं वाटलं ! त्याच प्रमुख कारण म्हणजे मराठी, कोंकणी भाषा फारच कमी कामावर पडली. हिंदीचा प्रचार वाढलाय. गोव्याचा माणूस बहुधा भारताबाहेर गेलाय किंवा मुंबईला आलाय असं वाटतयं.
पावसाळा असल्याने हॉटेलचे बुकींग पटकन आणी स्वस्तात मिळाले. अंघोळ, पुजाअर्चा आवरुन वेरणे औद्योगीक वसाहतीमधील काम करायला निघालो. रिक्षावाल्याशी घासघीस करुन रु. २५० चे रु. २२०/- केले. कंपनीत गेल्यावर रिक्षावाल्याला एक तासात येतो सांगून आत गेलो. मात्र काम संपवायला तीन तास लागले. बाहेर येऊन पाहतो तर हे महाशय अजुनही वाट पाहतायत. मग वेटींग चार्ज व परतीचे भाडे मिळून रु. ३५०/- रु. दिले. चार तासात ६००/- रु. ची कमाई म्हणजे बरीच म्हणायची.
काम वेळेवर संपवून दुसर्या दिवशी पुन्हा कामावर जायची घाई, घरी नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या भेटीची ओढ यामुळे लवकर घरचा रस्ता धरला.
काजू खरेदी करुन परतीचा रस्ता धरला मात्र गोवा अनुभवायचा राहूनच गेला. बघुया पुन्हा कधी जमतय का ते !
tu goayala gelas aani tithle beach, mandira kahich kase nahi re tu pahiles.
jar punha tula vel milala tar naki ja. tula kharach khup aavdel. aani jar ka tu la kahi Goa badal mahiti havi ashel tar naki sangh.
By: vidya on 05/02/2011
at 4:36 pm